Thursday, 1 September 2016

“एक सोहळा ऐसाही”



'पत्रकारिता'....लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक महत्त्वाचा स्तंभ. ज्यामुळे अनेक प्रश्नांना वाचा फोडणे सोपे होते, समस्यांतून मार्ग काढणे सोयीस्कर होते... पत्रकारितेचे यश पत्रकारांवर अवलंबून असते. यात पत्रकारांचा मोठा वाटा असतो. एखाद्या घटनेला लिखाणाच्या स्वरूपात रूपक भाषेत मांडण्याचे कार्य पत्रकार करत असतो. अनेकदा पत्रकाराने मांडलेल्या शैलीवर नकारात्मक भाष्य केले जाते. तर काहीवेळा त्या लिहिलेल्या सदरामुळे समाजात महत्त्वपूर्ण बदल घडून येतो आणि समस्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. शहरी तसेच ग्रामीण भागातील पत्रकार मेहनत घेऊन आपले कार्य पूर्ण करत असतात. शहरी भागात पत्रकारांचे ते कार्य दिसून येते त्यांना पुरस्कारांमार्फत प्रोत्साहन ही मिळते. परंतु, ग्रामीण भागातील पत्रकारांचं काय? ग्रामीण, दुर्गम भागात पत्रकारांमुळे काहीतरी वेगळे घडत असेल तर त्यांना कोणती शाबासकीची थाप का मिळत नाही? असा प्रश्न माझ्या मनात असतांनाच समर्थनया संस्थेबद्दल समजले आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर ही मिळाले...

समर्थन ही एक अशी संघटना जी राज्यातील धोरणात्मक प्रश्नावर विविध उपेक्षित समाजघटक व धोरणकर्ते यांच्यामधील कार्य सोयीस्करपणे पार पाडते. उपेक्षितांच्या न्याय्य हक्कांचे आणि संघर्षाचे समर्थन करणे हा यामागचा उद्देश्य आहे. मला या संघटनेविषयी कळाले त्यावेळी समर्थन बद्दल अभिमान वाटला आणि त्याबद्दल अजून माहिती जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. शेवटी, तो योग आलाच... समर्थन आणि मी शिकत असलेल्या संज्ञापन व पत्रकारिता विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने कलिना संकुलातील मुंबई विद्यापीठाच्या कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे मानवी हक्क वार्ता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमातील पत्रकारांना पुरस्कृत होतांना पाहण्याची संधी मला मिळाली.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ए.बी.पी. माझाचे संपादक राजीव खांडेकर, जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुंदर राजदीप, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष श्री. रामकृष्णन हे होते तसेच समर्थनचे संस्थापक विवेक पंडित, उपाध्यक्ष आशिष कुलकर्णी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले. त्यांनी केलेल्या अप्रतिम सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.

प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच समर्थन संघटना आणि मानवी हक्क वार्ता पुरस्कार, ग्रामीण संघटनांकडून व ग्रामीण पत्रकारांकडून येणारे लोकांचे प्रश्न समजुन घेण्याचे कार्य, प्रश्नावर विविध स्तरांपर्यंत चर्चा घडवून आणणे, लक्षही यंत्रणेविषयी माहिती प्रसारित करणे हे सर्व काम समर्थन कशाप्रकारे पूर्ण करते याविषयीची माहिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिली.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात परिश्रमपूर्वक वृत्तसंकलन करून मानवी हक्कांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देण्याचे हे 20 वे वर्ष आहे, असे जेव्हा अध्यक्षांकडून ऐकले तेव्हा समर्थन बद्दलचा माझ्या मनातील अभिमान वाढला. या कार्यक्रमांतर्गत प्रमुख अतिथींतर्फे "मानवी हक्क वार्ता पुरस्कार" विशेषांकाचे उद्घाटन करण्यात आले.

डॉ. सुंदर राजदीप यांनी आपले मत मांडतांना असे सांगितले की, मानवी हक्क वार्ता पुरस्कार खरोखरच पत्रकारांना प्रोत्साहित करणारा आहे. माझे बालपण अतिदुर्गम आदिवासी भागात गेल्यामुळे मला मानवी हक्कांबाबत द्यावा लागणाऱ्या लढ्याची जाणीव आहे, असे ते यावेळी म्हणाले. यासाठीच मानवी हक्काबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी समर्थनने पत्रकारिता विभागाशी संलग्नित राहून एखादी कार्यशाळा राबवावी, अशी कल्पना डॉ.राजदीप यांनी समर्थन अध्यक्षांना सुचवली.

मुद्रीत, दृकश्राव्य माध्यम यांच्या सोबतच सकारात्मक दृष्टीने सोशल मीडिया कशापद्धतीने पुढे जात आहे याबद्दल राजीव खांडेकर यांनी सांगितले. तसेच शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यातील पाण्याची गंभीर समस्या असो किंवा अंबाजोगाईतील मेडीकल हॉस्पिटलमधून लहान बाळाला मांजरीने पळवून घेऊन जाण्याची समस्या असो यासारख्या समस्यांना फक्त एक सक्षम पत्रकारच वाचा फोडू शकतो असे अनेक उदाहरणाद्वारे श्री. खांडेकर यांनी सांगितले.

निवड समिती सदस्य आशिष जाधव (महाराष्ट्र- 1 वृत्तवाहिनी सहसंचालक), नीरज राऊत (दै.सकाळ, पालघर जिल्हा प्रतिनिधी), रामकृष्णन (यूएनआय/पीटीआय) यांच्या दृष्टीने पुरस्कार प्राप्त असलेले पत्रकार खरचं पुरस्कारासाठी योग्य होते याची खात्री तेव्हा पटली जेव्हा त्यांच्या कारकिर्दीविषयी ऐकले. प्रत्येकाने ग्रामीण भागात विशेष कार्य केले होते, आपल्या वैशिट्यपूर्ण लेखणीतून प्रश्नाचे उत्तर मांडले होते.

प्रमुख अतिथींतर्फे हर्षद कशाळकर (दै.लोकसत्ता रायगड), रामदास साळुंखे (दै. जनप्रवास), ओमकार पोटे (दै. पुढारी), प्रताप मेटकरी (दै. सकाळ), राजलक्ष्मी पुजारे-जोशी (दै.महाराष्ट्र टाइम्स), भगवान खैरनार (दै.सकाळ पालघर), भास्कर सोनवणे (दै. सकाळ नाशिक) यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे नव्याने काम करण्याची उमेद निर्माण होते तसेच प्रोत्साहन मिळते, असे मत पुरस्कार विजेते हर्षल कशाळकर आणि राजलक्ष्मी पुजारे यांनी व्यक्त केले.

आपणही काहीतरी चांगले कार्य करावे, ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी समर्थन किंवा तत्सम संघटनेतर्फे पुढाकार घ्यावा, आणि पत्रकारितेच्या माध्यमाने लेखणीतून मानवी हक्कावर काहीतरी लिहावे, अशी इच्छा मला पुरस्कारप्राप्त विजेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून झाली.

-किशोरी यशवंत घायवट


होम मिनिस्टर ( Episode of serial)

        झी मराठी वाहिनी, माझी आवडती वाहिनी आहे.  यावरील कार्यक्रम खरचं बरेच काही शिकवतात.. झी मराठी, मी मराठी अशी टॅगलाईन असणारी ही वाहिनी अनेक कार्यक्रमांचा संच प्रेक्षकांसमोर सादर करत असते. त्यात जुळून येति रेशीमगाठी, जय मल्हार, नांदा सौख्य भरे, पसंत आहे मुलगी, सौभाग्यवती, होणार सून मी या घरची यांसारखे  अनेक कार्यक्रम आहे. त्यात मला होम मिनिस्टर हा कार्यक्रम आवडतो. 

      १० वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंदाचा, चैतन्याचा एक झरा वाहतोय, ज्याच्या दिवसागणिक मनोरंजनाच्या कक्षा रुंदावत जात आहेत. ‘दार उघड बये दार उघड’ असे म्हणत दररोज संध्याकाळी ६.३० वाजता आनंदाची उधळण करीत झी मराठीवर ‘होम मिनिस्टर’ घेऊन येतात महाराष्ट्राचे लाडके ‘आदेश भाऊजी’. महिलांना स्वतःचा असा आपला वाटणारा हा दूरचित्रवाणीवरील पहिलावहिला कार्यक्रम. १० वर्षात कार्यक्रमाची अनेक पर्व पार पडली. प्रत्येक पर्वात महाराष्ट्रातील घराघरातून मिळालेले प्रेम खूप मोलाचे होते. ‘होम मिनिस्टर’ने फक्त सुखाची दारं उघडून दिली नाहीत तर त्या त्या घरातील दुःखांवर मायेची फुंकरही घातली. लोकप्रिय अभिनेत्यांच्या घरापासून ते सर्वसामान्य वहिनींच्या घरात हा कार्यक्रम प्रत्येक घरात सुखाने नांदला.

कधी वहिणीसोबत तर कधी अनेक दिग्गजांसोबत खेळले जाणारे विविध खेळ, पैठणीचे रंग, घराची सजावट, ठिकाणांनुसार भाषेचा बदलत जाणारा लहेजा या सर्व सुखद गोष्टींचा अनुभव होमी मिनिस्टर या कार्यक्रमामुळे येतो. सुख, दुःख, मनोरंजन, मज्जा-मस्ती, ज्ञान या सर्वांचा मिलाप साधणारा होमी मिनिस्टर हा कार्र्यक्रम खरचं पाहण्यासारखा आहे.

झी मराठी अशीच महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात बहरत जावो व तमाम मराठी मुलुखाचा अभिमान व स्वाभिमान आपण जपत महाराष्ट्रासह देशभरातीलचं नव्हे तर जगभरात आपल्या वाहिनीचा व कार्यक्रमाचा नावलौकिक वाढीस लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना….!

 

किशोरी यशवंत घायवट

माझे कॉलेज जीवन ( College Life)



कॉलेज लाईफ  या शब्दांचा अर्थ किंवा महत्व कदाचित कॉलेज संपल्यावर जास्त समजतो कारण एखादी गोष्ट जेंव्हा आपल्याजवळ नसते तेव्हांच तिचे महत्व आपल्याला जास्त कळते आणि हे आनंदी दिवस तर आपल्या जीवनात अगदीच अलगद, नकळत येतात की जेव्हा आपण वयाच्या रुपांतरणाच्या अवस्थेत जास्त असतो. रुपांतरणाची अवस्था म्हणण्याचे कारण की, 11/12 वी ही जी महाविद्यालयीत वर्षे असतात, ती साधारणत: प्रत्येकाची कॉलेज या शव्दाचा अर्थ समजण्याच्या आधीच संपून जातात.  आपल्या कॉलेजची एक चांगली प्रथा आहे प्रत्येक बॅच स्वत:साठी एक नाव ठरवते आणि ती  बॅच त्याच नावाने ओळखली जाते. आजही FRIENDS FOREVER...  हा शव्द नुसता आठवलातरी संपूर्ण बॅच डोळयासमोर उभा राहते आणि संपूर्ण कॉलेज जीवन एका झटक्यात समोरुन निघून जाते. असे वाटते की, या नावात काही तरी जादू आहे. कॉलेजच्या काळात जेव्हा एखादा निर्णय घेण्याची वेळ यायची त्यावेळी मनात एक आत्मविश्वास  असायचा कारण तो निर्णय यशस्वी करण्यासाठी संपुर्ण बॅच आपल्या मागे आहे याची खात्री असायची. हा आत्मविश्वास  किंवा अशी खात्री असण्याला कारण ती म्हणजे बॅचमध्ये असणारी युनिटी. मतभेद, गृपस् प्रत्येक बॅच मध्ये असतातच आम्हीही काही त्याला वेगळे नव्हतोच पण जेव्हा सगळयांनी मिळून घेतलेला निर्णय आपल्याला मान्य असो किंवा नसो तोच आपला निर्णय आहे असे समजून बॅचला पाठींबा देणारी भावना आमच्यामध्ये होती. उदाहरणच द्यायचे झालेतर अक्षरश: आमच्या बॅचच्या नाव ठेवण्यावरुन ही बरेच मतभेद झाले परंतू जेव्हा नाव ठरले तेव्हा ते नाव प्रत्येकाने असे जगले की जसे काही ते नाव मीच सुचवले होते. मला वाटते की आमच्या सर्वांच्या सफल कॉलेज जीवनाचा खरा मुलमंत्र कदाचीत ही भावनाच होती. या भावनेनेच आमच्या बॅचला किंवा आमच्या कॉलेज जीवनाला एका विषेश आयामापर्यंत पोहचलेलो पाहतो.

   खरच  बीएमएम ची 'ती' ३ वर्षे कशी गेली ते कळलंच नाही, पण त्या तीन वर्षात केलेली मज्जा आयुष्यभर आठवण्यासारखी आहे. बिर्ला कॉलेज, तेथील निसर्गरम्य वातावरण, अनेक कार्यक्रम, वृक्षदिंडी, आर्ट सर्कल, बिर्लोस्तव, बिर्लाईट मॅगझीन, द्रिश्य, प्रवाह यांसारखे इव्हेंट्स नेहमी स्मरणात राहतील.... बिर्ला कॉलेज चे सर्व शिक्षकवृंद, इतर कर्मचारी खूप चांगले होते. अडचणीच्या वेळी मदतीसाठी तत्पर असणारे तेच होते, आणि काहीवेळा चूक झाली की माफ करून समजावून सांगणे ही तेच होते.... 

  पुन्हा त्या पहिल्या बाकावर बसून लेक्चर्स ऐकावे, नोट्स काढाव्यात, अभ्यासासोबत मौज-मज्जा करावी असे आता वाटते... खरचं ते दिवस पुन्हा जगावे आणि काही क्षणांसाठी का होईना पण त्यातच विसावून राहावे... 

 -किशोरी यशवंत घायवट


लक्षात राहिलेला प्रवास (Journey)


 पुणे – मुंबई प्रवास हा माझा तसा सर्वात आवडता प्रवास...  फक्त  हाय वे वर कोठे ट्रॅफिक नाही लागली की मग जरा बरं वाटतं.   काहीजण तर रोजच मुंबई- पुणे असा प्रवास करतात, त्यांना कंटाळा कसा येत नाही काय माहित?  मी एकदा माझ्या कॉलेज फ्रेंड्स सोबत पुण्याला गेले होते. कल्याण ते पुणे असा खाजगी बसने आम्ही प्रवास केला. प्रवासात गाण्यांच्या अंताक्षरी, काही जनरल  नॉलेज च्या गोष्टी शेयर होत होत्या. प्रवासात खूप मज्जा आलेली.  पुण्याला पोह्चल्यांनंतर आम्ही व्हिट्स हॉटेल मध्ये गेलो. तिथे सर्व सामान ठेवलं आणि मग नंतर फ्रेश होऊन आम्ही सर्वजण गोवर्धन फॅक्टरी ला भेट देण्यासाठी गेलो. प्रत्येक वेळी डिस्कवरी चॅनेल वर पाहिलेली प्रोसेस प्रत्यक्षात पाहतांना कुतूहल वाटत होते. तिथे आम्ही गोवर्धन च्या अनेक पदार्थांची खरेदी केली. तिथून आम्ही एका ठिकाणी गेलो जिथे सोलकढी खूप प्रसिद्ध होती. ते झाल्यांनतर आम्ही सारस बाग, पर्वती या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणांना पाहून आम्ही भारावून गेलो. ऐन पावसाळ्यात गेल्यामुळे तेथील देखावा पाहण्यासारखा होता. 

त्यांनतर आम्ही टिळक वाड्याला गेलो. टिळकांची स्मारक, पुस्तके, गणेशोत्वाची पालखी, सर्व फोटोज आम्ही न्याहाळून पाहत होतो. तिथे जाऊन आम्हाला खूप काही पाहता आले. त्यामुळे आमच्या ऐतिहासिक ज्ञानात भर पडली.. विद्येचे माहेरघर असणारे पुणे तिथे काय उणे हे म्हणणे तसे खरेच आहे. याची जाणीव पुण्याला गेल्यावर नक्की होते. 

- किशोरी यशवंत घायवट

Tuesday, 30 August 2016

संस्कृतदिनम् कार्यक्रमा: (Phenomenon)




अनेक वर्षांपासून नारळी पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या संस्कृत दिनाचे निमित्त साधून विद्यापीठाच्या संस्कृत विभाग तसेच ऋतायन या संस्कृत प्रेमी मंडळातर्फे कलिना संकुलातील मुंबई विद्यापीठात 'संस्कृतदिनम्'  साजरा करण्यात आला.  त्या कार्यक्रमाला हजर राहण्याची संधी मला मिळाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत भाषेत करण्यात आले. संस्कृत भाषा ऐकून ती समजून घेणे ही माझ्यासाठी कसरतच होती, पण तरी सुद्धा त्यात मला एक वेगळा आनंद मिळाला. नमो नमः अस्मिन् कार्यक्रमे भवत्या: स्वागतम्। असे संस्कृत वाक्य बोलून कार्यक्रमाची संस्कारमय सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभागाच्या प्रमुख माधवी नरसाळे यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विनोद मंकारा हे होते.  लेखक, कवी, तसेच 600 माहितीपटांचे दिग्दर्शक असणारे विनोद मंकारा यांचे फुलगुच्छ  देऊन स्वागत करण्यात आले.


स्वागत समारंभ पार पडल्यांनंतर विनोद मंकारा दिग्दर्शित तसेच राष्ट्रीय पुरस्कार प्रदान संस्कृत भाषेतील तिसरा चित्रपट म्हणून प्रसिद्ध असणारा प्रियमानसम् हा चित्रपट दाखविण्यात आला. रंग, प्रेम, नृत्य, संगीत आणि भावना या कलांचे उत्तम मिलाप साधणारा प्रियमानसम् हा चित्रपट पाहून छान वाटले. शांतता व ज्ञानाचे प्रतीक असणारा शुभ्र रंग, प्रेम व क्रोध दर्शवणारा भडक लाल रंग, तसेच निसर्गाची सुंदरता वर्णनारा हिरवा रंग या तिन्ही रंगांची सांगड चित्रपटात उत्तमरीत्या साधल्यामुळे खरे नेत्रसुख मिळत होते.  संस्कृत भाषेतील चित्रपटात असणारे संगीत मंत्रमुग्ध करणारे होते. संस्कृत भाषा समजून घेतांना येणारा  अडथळा उपशिर्षकांमुळे दूर होत होता. अशा उत्तम कलाकृतींपर्यंत आपण का पोहचत नाहीत? असा प्रश्न चित्रपट पाहून झाल्यांनतर मनात उपस्थित राहिला होता....त्यांनतर श्री. पंकज आठवले यांनी श्री. विनोद मंकारा यांना त्यांच्या चित्रपट आणि चित्रपटाच्या यशाबद्दल काही प्रश्न विचारले. त्यावेळी श्री. विनोद यांनी त्यांची मातृभाषा मल्याळी मध्ये उत्तरे दिली, ती सर्व उत्तरे श्रीमती. सुशीला यांनी भाषांतरीत करून सांगितली. मातृभाषा मल्याळी असून देखील संस्कृत भाषेबद्दल असणारा आदर मला संस्कृत चित्रपट बनविण्यास प्रवृत्त करून गेला असे श्री. विनोद यांनी सांगितले.  यावेळी पंकज आठवले यांनी संस्कृत भाषा प्रचलित व्हावी या उद्देशाने रोज काहीतरी संस्कृत भाषेत बोलावे असे वचन सर्वांकडून करून घेतले. तसेच 'तू मला आवडतेस'  या वाक्याचे अहं: त्वहं: कामये  असे संस्कृत भाषांतर ही करून घेतले ज्यामुळे तरुणाईमध्ये या भाषेबद्दल गोडी निर्माण होऊन निदान एक वाक्य तरी ते संस्कृत भाषेत बोलू शकतील.


या चर्चासत्रानंतर काही शालेय विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेत हावभाव करून गोष्टी सांगितल्या. लहान मुलांच्या बोबड्या बोलांमुळे संस्कृत भाषा ऐकण्यास अधिक गोड वाटत होती. काही विद्यार्थ्यांनी रामायण गीत म्हटले , 'श्रीगणेशाय धीमही' हे गणेशाचे संस्कृत गीत गायले. त्यांनतर सर्वांना सुधर्मा या संस्कृत दिनपत्रिकेचे वाटप करण्यात आले. तसेच संस्कृत डिप्लोमा कोर्स, संस्कृत एम.ए स्टडी, संस्कृत ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्स, संस्कृत पी.जी. डिप्लोमा कोर्स, मॅन्युस्क्रिपटॉलॉजी या अभ्यासक्रमांतगर्त यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप संस्कृत पसायनदानाने करण्यात आला.


अशा संस्कृतमय वातावरणाचा आनंद मला घेता आला, आणि रोज नवीन संस्कृत शब्द शिकून संस्कृत भाषा जतन करून ठेवण्याचा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला याबाबदल मुंबई विद्यापीठाच्या  संस्कृतम् विभागस्य धन्यवादम्|


-किशोरी यशवंत घायवट


हो अशीच आहे मी (About myself)

स्वतः  बद्दल काहीतरी लिहायच हा म्हणजे एक मोठा प्रश्नच आहे. आपण इतरांबद्दल बरच काही बोलतो, लिहितो पण स्वतः बद्दल लिहिण्याची वेळ तशी कधी येत नाही. तरीही स्वतः बद्दल लिहिण्याचा केलेला हा प्रयत्न ..... 

 हो अशीच आहे मी शांत स्वभावाची, सरळ- साधी, प्रत्येकाच्या मदतीसाठी तत्पर असणारी, मनमिळाउ ही आहे मी दुसऱ्याच्या मनाचा विचार करणारी, दुसऱ्याला न दुखवता स्वत: दु:खी होणारी...हो अशीच आहे मी सुंदर हस्ताक्षराने मनातील भावना कागदावर उमटवणारी, लेखणीतून व्यक्त होणारी, लेखनाची आणि कविता करण्याची आवड असणारी.. आहे  मी काहीशी क्रिएटिव्ह.. प्रत्येक गोष्ट सजवणारी.. प्रत्येक वस्तूची साफ-सफाई करणारी आणि जबाबदारीने वागणारी... जगते मी बऱ्याचदा सकारात्मक दृष्टीकोन घेऊन.. प्रामाणिकपणा हा जणू माझ्या जगण्याचा भागच आहे. समोरच्या व्यक्तीच्या चुका स्वीकारून त्यांना माफ करण्यात मला आनंद मिळतो. मला नवीन गोष्टी शिकून त्यांचे निरीक्षण करायला आवडते. अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला आवडतो तसेच त्याबद्दल लिहायला ही आवडते. मी संयमी आहे, खूप संयम बाळगून समोरच्याच ऐकून घेते. मी लोकांना महत्व देते. आणि कदाचित त्यामुळेच अनेकदा माझ्या मनातल्या गोष्टी अपूर्ण राहतात. मला नाती जोडायला आणि जपायला आवडतात. माणसं ओळखण्यात काहीवेळा मी चूक करते त्यामुळे ती गोष्ट मला शिकून घ्यायची आहे. मला गाण्याची खूप आवड आहे म्हणून मी सतत माझ्या मनातलं गाणं गात असते. मी माझ्या जवळच्या व्यक्तींबाबत खूप हळवी आहे पण तितकीच मजबूत ही आहे. परिस्थिती समजून घेऊन त्यातून सावरायचा प्रयत्न करत असते. हो अशीच आहे मी...थोडी बालिश.. आनंदाने हसणारी, बागडणारी... तरीही मनातील स्वप्न उरात बाळगून भरारी मारण्याचा प्रयत्न करणारी... 

पुढील ५ वर्षात मी अशा ठिकाणी असेन जिथे मला खरचं जाण्याची आवड आहे. मला फोटोग्राफी शिकायची आहे. तसेच मला नेट ची परीक्षा देऊन स्पर्धा परीक्षांसाठी ही प्रयत्न करायचा आहे. लेखनाचे कौशल्य सुधारून स्वतः चे एक पुस्तक लिहायचे आहे. माझ्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करून त्यांचे स्वप्न पूर्णत्वास आणायचे आहे. 

-किशोरी यशवंत घायवट

माझ्या स्वप्नातल्या गोष्टी (Bucket List)

 प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टींचा अनुभव घ्यायचा असतो.. ती गोष्ट त्याच्या आवाक्याबाहेरची असली तरी त्याला त्या गोष्टीबद्दल आकर्षण असतचं.. अशाच काही १० गोष्टी माझ्या आयुष्यातल्या...माझ्या स्वप्नातल्या...ज्या मला पूर्ण करायच्या आहेत..

  • लवकर लग्न होऊन संसारात मग्न झालेल्या माझ्या आईला जास्त कुठे फिरताच आले नाही. मी मोठी होत असतांना माझा सांभाळ, माझा अभ्यास, माझे छंद जोपासण्यात तिचा वेळ गेला. म्हणून तिला बाहेरच्या जगाची पुरेशी ओळख नाही. यासाठीच मला एकदा तरी आईला सोबत घेऊन पूर्ण मुंबई फिरायची आहे..मुंबई कशी आहे, मुंबई कशी पडायला आणि सावरायला शिकवते हे दाखवायचे आहे. 

  • पहिल्यापासून दूरदर्शन वर अनेक  कार्यक्रमांत मोठी-मोठी घरं पाहिली होती, त्या घराबाहेर असणारा झोपाळा, मस्त झाडे, घरात गेल्यांनंतर असणारा गालिचा, झुंबर, भिंतींवर असणारे नक्षीकाम या सर्वांनी माझं लक्ष वेधून घेतलं होत. तेव्हा पासून मनात इच्छा आहे की छोटसं का होइना पण स्वत:च घर घ्यावं, त्या घराला माझ्या मनाप्रमाणे सजवावं, गच्चीमध्ये उभे राहून हातांवर त्या पाऊसधारा घ्याव्यात आणि विचारांत गुंतून जावे. 

  •  अभिनेत्री मृणाल दुसानीस अनेक कार्यक्रमांद्वारे प्रेषकांपर्यंत पोहचली. तीच सुंदर दिसणं, लाजणं, मनमोकळेपणे हसणं, या सर्वच गोष्टी मला खूप आवडतात. एखाद्या मुलाखतीमध्ये ती जेव्हा  बोलते तेव्हा तिच्यात मला मीच दिसते. तिचे आणि माझे विचार बऱ्याचदा मला सारखेच वाटतात. म्हणून एकदा तरी मला तिच्याशी भेटून संवाद साधायचा आहे.

  • कोणत्याही व्यक्तीला काही ही वाईट बोलून रडवणे तसे सोप्पेच असते. परंतु, एखाद्या व्यक्तीला हसवणे हे मात्र  कठीणच काम आहे. दुसऱ्याला हसवण्यासाठी मुळात ती व्यक्ती सिरीयस असावी लागते तर असे  हसवण्याचे काम करणारे अभिनेता हास्यसम्राट भालचंद्र कदम यांना मला भेटायचं आहे. त्यांच्यासोबत चर्चा करून हसायचं आहे. 

  • मला लिहिण्याची आणि कविता करण्याची आवड आहे. मी जे वाटेल, ते मनात येईल ते मी लिहीत असते. त्यासाठीच मला स्वत: च एखाद तरी पुस्तक लिहायचे आहे. मग ते कोणत्याही विषयावर असो किंवा कवितेवर असो. ते पुस्तक लिहून प्रकाशित करायचे आहे. 

  • मला गाण्याची ही खूप आवड आहे. मी अनेकदा गुणगुणत असते. माझ्या आवडीची अनेक गाणी मला तोंडपाठ आहेत. एखाद्या कार्यक्रमात मला स्टेजवर गाणे सादर करायचे आहे.

  • मी इतकी फूडी नाही. जे पदार्थ आवडतात त्यांचाच आस्वाद घेत असते. त्यामुळे काही स्वादिष्ट पदार्थांची चव घेणे माझ्याकडून राहून गेलं आहे. म्हणूनच मला खाण्याचे वेगवेगळे पदार्थ टेस्ट करून पाहायचे आहे. 

  • कुटुंबासोबत फिरण्यात एक वेगळी मज्जा असते. जर तो फिरण्याचा आनंद विमानात बसून घेता आला तर किती मज्जा येईल!  म्हणूनच मला विमानात बसून माझ्या कुटूंबासोबत विदेशात जायचे आहे..बाहेरचा देश, तेथील संस्कृती, तेथील निसर्ग पाहायचा आहे. 

  • फोटोग्राफी चे संपूर्ण तंत्र शिकून छान फोटोज काढायचे आहेत. मी निसर्गप्रेमी असल्यामुळे निसर्गाच्या सुंदर देखाव्यासोबत मला छायाचित्रण करायचे आहे. देखाव्याचे क्षण टिपायचे आहेत. 

  • मला नृत्याची देखील आवड आहे. आतापर्यंत मी राजस्थानी, ओडिसी, आसामी, उत्तरांचल येथील संस्कृतींवर आधारलेल्या गाण्यांवर नृत्य केला आहे. आता मला प्रत्येक संस्कृतीची, भाषा शिकून त्यांच्या लोकसंगीतावर नृत्य करायचा आहे. 

-किशोरी यशवंत घायवट

चिव-चिव चिऊताई

स्वतःला एक पक्षी म्हणून कल्पना करून काहीतरी लिहिणे म्हणजे एक मोठ आव्हानच आहे. पण ते आव्हान स्वीकारून लिहिताना मात्र खूप छान वाटलं. मी स्वत: ला एखादा पक्षी म्हणून कल्पना करताना अनेक पक्ष्यांची प्रतिमा माझ्या समोर उभी राहिली. त्यात मी  स्वतःला "चिमणी" या पक्ष्याचे चित्र समोर आणून मी चिमणी असल्याची कल्पना केली.  लहानपणापासूनच चिऊताई चिऊताई दार उघड! ही एका गोष्टीतली   ओळ  इतकी चांगली लक्षात राहिली आहे की आता चिमणी म्हणून स्वतः ला कल्पना करत असतांना लहान झाल्यासारखे वाटत आहे.

भारत  देशात सर्वात जास्त संख्येने असणारा पक्षी म्हणून चिमणी हा पक्षी अधिक परिचयाचा आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. चिमणी मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते.

मी चिमणी झाले  तर मला ज्या ज्या ठिकाणी फिरायचे आहे त्या सर्व ठिकाणी फिरून घेईन. स्वच्छंद होऊन उडण्याचा मनसोक्त आनंद घेईन. हव्या त्या ठिकाणी बागडेन, मोकळा श्वास घ्यायला मिळाल्यासारख बेधुंद होऊन आकाश आपलेसे करून त्यात सामावून जाईन. कधीतरी माझ्याच घराच्या खिडकीत जाऊन माझ्या चिव चिव ने आईला बोलावून माझ्या जेवणाची सोय करून घेईन. तिने दिलेले तांदुळाचे दाणे मज्जेने खाईन आणि पुन्हा भरारी घेईन माझ्याच स्वप्नाच्या रंगात रंगण्यासाठी.

खरंच, कधीतरी  चिमणी बनून त्या निळ्याशार गगनात उंच झेप घ्यावी आणि रोजच्या जीवनातून मुक्त होऊन स्वातंत्र्याचे गाणे गावे... असे झाले तर खरेच जीवनात एक वेगळी नशा चढेल आणि एक वेगळी दिशा मिळेल.

-किशोरी यशवंत घायवट

Wednesday, 20 July 2016

राजभवन एक विलक्षण अनुभव (Infrastructure)



स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दादरा, नगर, हवेली येथील स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सेनानींचा सत्कार समारंभ राजभवन येथे करण्याचे आयोजिले होते. मंत्रालयातर्फे मला त्या कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी अनेकांनी सांगितले की, ते अतिशय सुंदर ठिकाण आहे....हे ऐकल्यामुळे तिथे जाण्याची उत्सुकता वाढली होती. मी, माझे दोन सहकारी आणि कुपेरकर मॅडम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या गाडीने तिथे पोहोचलो. तिथे पोहचताच गाडीतून जो देखावा पहावयास मिळाला तो विलोभनीय होता. त्यावरून नजर हटणे शक्यच नव्हते. संपूर्ण हिरवळीने बहरलेला 'तो' परिसर, अथांग महासागर, सूर्याची किरणे पडल्यामुळे चमकणारे पाणी, आणि 'त्या' वाहणाऱ्या लाटा...

सुरक्षा रक्षकांनी राजभवनाच्या सुरक्षेच्यादृष्टीने आमची ओळख विचारून घेतली. नक्की काय काम आहे हे आमच्याकडून जाणून घेतले. पूर्ण शहानिशा केल्यानंतर त्यांनी आत प्रवेश करण्यास परवानगी दिली. आत प्रवेश केल्यानंतर समोरच उंच तिरंगा दिसला. जलभूषण, जलविहार अशी नाव असलेली दोन कौलारू भवन दिसली. शुभ्र रंग तसेच जाळीदार नक्षीचे बांधकाम केलेल्या त्या भवनांना कौलांचा मातकट रंग शोभून दिसत होता. वेगवेगळ्या रंगांची अनेक फुलझाडे, नारळाची झाडे, जुन्या वृक्षांची ओळख पटावी म्हणून त्यांना लावलेली नावाची पाटी, शांत आणि शिस्तीचे वातावरण या सर्वच गोष्टी मोहित करण्यासारख्या होत्या.. आम्ही 'जलभूषण' या भवनात प्रवेश केला. प्रशस्त दिवाणखोली, वेगवेगळे विजेचे झुंबर, सुंदर नक्षीकाम केलेले गालिचे या गोष्टींनी माझे लक्ष वेधून घेतले. आत प्रवेश करताच तिथे उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सर्वांना कार्यक्रमाचे स्वरूप समजावून सांगितले. बरोबर ४ वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे आगमन झाले. त्यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या एकूण २० स्वातंत्र्य सेनानींचा सन्मानपत्र, शाल, तसेच विवेकानंद यांचे ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले. मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्य सेनानी वयाने वृध्द असले तरी मनाने अजून ही तरुणच आहेत याची पोचपावती त्यांनी केलेल्या घोषणांमुळे मिळाली. राज्यपालांनी त्यावेळी असे म्हटले की, राजभवनातील हा सत्कार समारंभ माझ्या हृदयाला भिडणारा कार्यक्रम आहे. दादरा, नगर, हवेली येथील स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या या वीरांना माझा सलाम आहे.

त्या प्रशस्त कार्यालयात ब्रम्ह, विष्णू, महेश्वर यांची सुंदर त्रिमूर्ती ठेवण्यात आली होती. तिच्याच पुढे गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्या ही ठेवण्यात आल्या होत्या. तिथे कामावर रुजू असणारे सहकारी त्यांना सोपविलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडत होते. कार्यक्रम संपल्यानंतर आपण कोणत्या तरी बाहेरच्या ठिकाणी आलो आहोत अशी भावना मनात येताच 'महाराष्ट्र शासन' अशा नावाचा चिन्ह असलेला पाण्याचा ग्लास, चहाचा कप, आणि अल्पोहाराने भरलेली प्लेट समोर येते. आणि तेव्हा आपण एका शासकीय ठिकाणी असल्याची जाणीव मनात कायम राहते.

-किशोरी यशवंत घायवट

शिक्षक होण खरच सोप्प नसत!

शिक्षक होऊ पाहणाऱ्या किंवा शिक्षक होण्यात काय अवघड आहे ? असा समज बाळगणाऱ्या तरुणांसाठी … ' छडी लागे छम छम ' चा जमाना संपला आ...