पत्रकारिता विषयाला असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशीप करावी लागते. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या वृत्तपत्रात, न्यूज चॅनेल्सला पाठविण्यात येते. माझ्या बॅचच्या विद्यार्थ्यांची आंतरवासिता म्हणून थेट मंत्रालयातील माहिती विभागात नियुक्ती करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो. तेथे काम करण्याचा अनुभव काही औरच असतो.
मुंबई विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता या विभागात शिकत असताना मंत्रालयाला भेट देण्याचा योग आला. या दोन दिवसीय भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. शिक्षणमंत्री विनोद तावडे, विरोधी पक्ष नेते मा. धनंजय मुंडे यांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची, तसेच त्यांच्याकडून पत्रकारिता या क्षेत्राबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश करण्यासाठी उभे असलेल्यांची गर्दी आणि त्यात मी मध्येच येऊन एका ओळखपत्राच्या आधारे थेट मिळविलेला प्रवेश हा अनुभव अविस्मरणीय आहे. मंत्रालयात वावरत असताना प्रत्येक ठिकाणी जबाबदारीची जाणीव येते. मंत्रालयातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस करत असलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे.
मुख्य इमारतीच्या तळ मजल्यावर असलेले माहिती व जनसंपर्क महासंचानालयात मी जेव्हा प्रवेश केला. तेव्हा संचालक (माहिती/प्रशासन) मा.देवेंद्र भुजबळ यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र शासनाचे 'महान्युज' या वेब पोर्टल साठी काम करण्याचे सांगितले. महान्युज वेब पोर्टलचे सहायक संचालक बी.के.झंवर सरांनी इंटर्नशीपच्या पहिल्याच दिवशी त्यांच्याकडे असलेले अनुभव माझ्याशी शेअर केले. महान्युज मधील इतर सहकाऱ्यांची ओळख करून दिली.
महान्युजला 'महाभ्रमंती' सदरासाठी मी 'माहुली गड' यावर लेख लिहिला. तो लेख माझ्या नावासहित प्रसिद्धही करण्यात आला. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. वसुधा कामत यांची मी मुलाखत घेतली. हा अनुभव नेहमी माझ्या लक्षात राहील. येथील वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जण मोठ्या पदावर असून देखील त्यांच्या कामातून वेळ काढून आम्हाला हवी ती माहिती देतात, मदत करतात. सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीसाठी असच शिकत राहावं, अनेक काम करावी, त्यांना मदत करावी अशी इच्छा मनात येताच ओळख पत्रावरील 'तात्पुरते' हा शब्द आठवतो, आणि आपण येथे काही दिवसांकरिताच आहोत याची जाणीव होते. त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर काम करण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची उमेद निर्माण होते.
-किशोरी यशवंत घायवट
No comments:
Post a Comment