Wednesday, 20 July 2016

राजभवन एक विलक्षण अनुभव (Infrastructure)



स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दादरा, नगर, हवेली येथील स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सेनानींचा सत्कार समारंभ राजभवन येथे करण्याचे आयोजिले होते. मंत्रालयातर्फे मला त्या कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी अनेकांनी सांगितले की, ते अतिशय सुंदर ठिकाण आहे....हे ऐकल्यामुळे तिथे जाण्याची उत्सुकता वाढली होती. मी, माझे दोन सहकारी आणि कुपेरकर मॅडम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या गाडीने तिथे पोहोचलो. तिथे पोहचताच गाडीतून जो देखावा पहावयास मिळाला तो विलोभनीय होता. त्यावरून नजर हटणे शक्यच नव्हते. संपूर्ण हिरवळीने बहरलेला 'तो' परिसर, अथांग महासागर, सूर्याची किरणे पडल्यामुळे चमकणारे पाणी, आणि 'त्या' वाहणाऱ्या लाटा...

सुरक्षा रक्षकांनी राजभवनाच्या सुरक्षेच्यादृष्टीने आमची ओळख विचारून घेतली. नक्की काय काम आहे हे आमच्याकडून जाणून घेतले. पूर्ण शहानिशा केल्यानंतर त्यांनी आत प्रवेश करण्यास परवानगी दिली. आत प्रवेश केल्यानंतर समोरच उंच तिरंगा दिसला. जलभूषण, जलविहार अशी नाव असलेली दोन कौलारू भवन दिसली. शुभ्र रंग तसेच जाळीदार नक्षीचे बांधकाम केलेल्या त्या भवनांना कौलांचा मातकट रंग शोभून दिसत होता. वेगवेगळ्या रंगांची अनेक फुलझाडे, नारळाची झाडे, जुन्या वृक्षांची ओळख पटावी म्हणून त्यांना लावलेली नावाची पाटी, शांत आणि शिस्तीचे वातावरण या सर्वच गोष्टी मोहित करण्यासारख्या होत्या.. आम्ही 'जलभूषण' या भवनात प्रवेश केला. प्रशस्त दिवाणखोली, वेगवेगळे विजेचे झुंबर, सुंदर नक्षीकाम केलेले गालिचे या गोष्टींनी माझे लक्ष वेधून घेतले. आत प्रवेश करताच तिथे उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सर्वांना कार्यक्रमाचे स्वरूप समजावून सांगितले. बरोबर ४ वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे आगमन झाले. त्यांच्या हस्ते उपस्थित असलेल्या एकूण २० स्वातंत्र्य सेनानींचा सन्मानपत्र, शाल, तसेच विवेकानंद यांचे ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले. मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्य सेनानी वयाने वृध्द असले तरी मनाने अजून ही तरुणच आहेत याची पोचपावती त्यांनी केलेल्या घोषणांमुळे मिळाली. राज्यपालांनी त्यावेळी असे म्हटले की, राजभवनातील हा सत्कार समारंभ माझ्या हृदयाला भिडणारा कार्यक्रम आहे. दादरा, नगर, हवेली येथील स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या या वीरांना माझा सलाम आहे.

त्या प्रशस्त कार्यालयात ब्रम्ह, विष्णू, महेश्वर यांची सुंदर त्रिमूर्ती ठेवण्यात आली होती. तिच्याच पुढे गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्या ही ठेवण्यात आल्या होत्या. तिथे कामावर रुजू असणारे सहकारी त्यांना सोपविलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडत होते. कार्यक्रम संपल्यानंतर आपण कोणत्या तरी बाहेरच्या ठिकाणी आलो आहोत अशी भावना मनात येताच 'महाराष्ट्र शासन' अशा नावाचा चिन्ह असलेला पाण्याचा ग्लास, चहाचा कप, आणि अल्पोहाराने भरलेली प्लेट समोर येते. आणि तेव्हा आपण एका शासकीय ठिकाणी असल्याची जाणीव मनात कायम राहते.

-किशोरी यशवंत घायवट

No comments:

Post a Comment

शिक्षक होण खरच सोप्प नसत!

शिक्षक होऊ पाहणाऱ्या किंवा शिक्षक होण्यात काय अवघड आहे ? असा समज बाळगणाऱ्या तरुणांसाठी … ' छडी लागे छम छम ' चा जमाना संपला आ...