'पत्रकारिता'....लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक महत्त्वाचा स्तंभ. ज्यामुळे अनेक प्रश्नांना वाचा फोडणे सोपे होते, समस्यांतून मार्ग काढणे सोयीस्कर होते... पत्रकारितेचे यश पत्रकारांवर अवलंबून असते. यात पत्रकारांचा मोठा वाटा असतो. एखाद्या घटनेला लिखाणाच्या स्वरूपात रूपक भाषेत मांडण्याचे कार्य पत्रकार करत असतो. अनेकदा पत्रकाराने मांडलेल्या शैलीवर नकारात्मक भाष्य केले जाते. तर काहीवेळा त्या लिहिलेल्या सदरामुळे समाजात महत्त्वपूर्ण बदल घडून येतो आणि समस्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. शहरी तसेच ग्रामीण भागातील पत्रकार मेहनत घेऊन आपले कार्य पूर्ण करत असतात. शहरी भागात पत्रकारांचे ते कार्य दिसून येते त्यांना पुरस्कारांमार्फत प्रोत्साहन ही मिळते. परंतु, ग्रामीण भागातील पत्रकारांचं काय? ग्रामीण, दुर्गम भागात पत्रकारांमुळे काहीतरी वेगळे घडत असेल तर त्यांना कोणती शाबासकीची थाप का मिळत नाही? असा प्रश्न माझ्या मनात असतांनाच ‘समर्थन’ या संस्थेबद्दल समजले आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर ही मिळाले...
समर्थन ही एक अशी संघटना जी राज्यातील धोरणात्मक प्रश्नावर विविध उपेक्षित समाजघटक व धोरणकर्ते यांच्यामधील कार्य सोयीस्करपणे पार पाडते. उपेक्षितांच्या न्याय्य हक्कांचे आणि संघर्षाचे समर्थन करणे हा यामागचा उद्देश्य आहे. मला या संघटनेविषयी कळाले त्यावेळी समर्थन बद्दल अभिमान वाटला आणि त्याबद्दल अजून माहिती जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. शेवटी, तो योग आलाच... समर्थन आणि मी शिकत असलेल्या संज्ञापन व पत्रकारिता विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने कलिना संकुलातील मुंबई विद्यापीठाच्या कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे मानवी हक्क वार्ता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमातील पत्रकारांना पुरस्कृत होतांना पाहण्याची संधी मला मिळाली.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ‘ए.बी.पी. माझा’चे संपादक राजीव खांडेकर, जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुंदर राजदीप, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष श्री. रामकृष्णन हे होते तसेच समर्थनचे संस्थापक विवेक पंडित, उपाध्यक्ष आशिष कुलकर्णी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले. त्यांनी केलेल्या अप्रतिम सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.
प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच समर्थन संघटना आणि मानवी हक्क वार्ता पुरस्कार, ग्रामीण संघटनांकडून व ग्रामीण पत्रकारांकडून येणारे लोकांचे प्रश्न समजुन घेण्याचे कार्य, प्रश्नावर विविध स्तरांपर्यंत चर्चा घडवून आणणे, लक्षही यंत्रणेविषयी माहिती प्रसारित करणे हे सर्व काम समर्थन कशाप्रकारे पूर्ण करते याविषयीची माहिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिली.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात परिश्रमपूर्वक वृत्तसंकलन करून मानवी हक्कांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देण्याचे हे 20 वे वर्ष आहे, असे जेव्हा अध्यक्षांकडून ऐकले तेव्हा समर्थन बद्दलचा माझ्या मनातील अभिमान वाढला. या कार्यक्रमांतर्गत प्रमुख अतिथींतर्फे "मानवी हक्क वार्ता पुरस्कार" विशेषांकाचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. सुंदर राजदीप यांनी आपले मत मांडतांना असे सांगितले की, मानवी हक्क वार्ता पुरस्कार खरोखरच पत्रकारांना प्रोत्साहित करणारा आहे. माझे बालपण अतिदुर्गम आदिवासी भागात गेल्यामुळे मला मानवी हक्कांबाबत द्यावा लागणाऱ्या लढ्याची जाणीव आहे, असे ते यावेळी म्हणाले. यासाठीच मानवी हक्काबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी समर्थनने पत्रकारिता विभागाशी संलग्नित राहून एखादी कार्यशाळा राबवावी, अशी कल्पना डॉ.राजदीप यांनी समर्थन अध्यक्षांना सुचवली.
मुद्रीत, दृकश्राव्य माध्यम यांच्या सोबतच सकारात्मक दृष्टीने सोशल मीडिया कशापद्धतीने पुढे जात आहे याबद्दल राजीव खांडेकर यांनी सांगितले. तसेच शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यातील पाण्याची गंभीर समस्या असो किंवा अंबाजोगाईतील मेडीकल हॉस्पिटलमधून लहान बाळाला मांजरीने पळवून घेऊन जाण्याची समस्या असो यासारख्या समस्यांना फक्त एक सक्षम पत्रकारच वाचा फोडू शकतो असे अनेक उदाहरणाद्वारे श्री. खांडेकर यांनी सांगितले.
निवड समिती सदस्य आशिष जाधव (महाराष्ट्र- 1 वृत्तवाहिनी सहसंचालक), नीरज राऊत (दै.सकाळ, पालघर जिल्हा प्रतिनिधी), रामकृष्णन (यूएनआय/पीटीआय) यांच्या दृष्टीने पुरस्कार प्राप्त असलेले पत्रकार खरचं पुरस्कारासाठी योग्य होते याची खात्री तेव्हा पटली जेव्हा त्यांच्या कारकिर्दीविषयी ऐकले. प्रत्येकाने ग्रामीण भागात विशेष कार्य केले होते, आपल्या वैशिट्यपूर्ण लेखणीतून प्रश्नाचे उत्तर मांडले होते.
प्रमुख अतिथींतर्फे हर्षद कशाळकर (दै.लोकसत्ता रायगड), रामदास साळुंखे (दै. जनप्रवास), ओमकार पोटे (दै. पुढारी), प्रताप मेटकरी (दै. सकाळ), राजलक्ष्मी पुजारे-जोशी (दै.महाराष्ट्र टाइम्स), भगवान खैरनार (दै.सकाळ पालघर), भास्कर सोनवणे (दै. सकाळ नाशिक) यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे नव्याने काम करण्याची उमेद निर्माण होते तसेच प्रोत्साहन मिळते, असे मत पुरस्कार विजेते हर्षल कशाळकर आणि राजलक्ष्मी पुजारे यांनी व्यक्त केले.
आपणही काहीतरी चांगले कार्य करावे, ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी समर्थन किंवा तत्सम संघटनेतर्फे पुढाकार घ्यावा, आणि पत्रकारितेच्या माध्यमाने लेखणीतून मानवी हक्कावर काहीतरी लिहावे, अशी इच्छा मला पुरस्कारप्राप्त विजेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून झाली.
-किशोरी यशवंत घायवट