Thursday, 1 September 2016

“एक सोहळा ऐसाही”



'पत्रकारिता'....लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक महत्त्वाचा स्तंभ. ज्यामुळे अनेक प्रश्नांना वाचा फोडणे सोपे होते, समस्यांतून मार्ग काढणे सोयीस्कर होते... पत्रकारितेचे यश पत्रकारांवर अवलंबून असते. यात पत्रकारांचा मोठा वाटा असतो. एखाद्या घटनेला लिखाणाच्या स्वरूपात रूपक भाषेत मांडण्याचे कार्य पत्रकार करत असतो. अनेकदा पत्रकाराने मांडलेल्या शैलीवर नकारात्मक भाष्य केले जाते. तर काहीवेळा त्या लिहिलेल्या सदरामुळे समाजात महत्त्वपूर्ण बदल घडून येतो आणि समस्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. शहरी तसेच ग्रामीण भागातील पत्रकार मेहनत घेऊन आपले कार्य पूर्ण करत असतात. शहरी भागात पत्रकारांचे ते कार्य दिसून येते त्यांना पुरस्कारांमार्फत प्रोत्साहन ही मिळते. परंतु, ग्रामीण भागातील पत्रकारांचं काय? ग्रामीण, दुर्गम भागात पत्रकारांमुळे काहीतरी वेगळे घडत असेल तर त्यांना कोणती शाबासकीची थाप का मिळत नाही? असा प्रश्न माझ्या मनात असतांनाच समर्थनया संस्थेबद्दल समजले आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर ही मिळाले...

समर्थन ही एक अशी संघटना जी राज्यातील धोरणात्मक प्रश्नावर विविध उपेक्षित समाजघटक व धोरणकर्ते यांच्यामधील कार्य सोयीस्करपणे पार पाडते. उपेक्षितांच्या न्याय्य हक्कांचे आणि संघर्षाचे समर्थन करणे हा यामागचा उद्देश्य आहे. मला या संघटनेविषयी कळाले त्यावेळी समर्थन बद्दल अभिमान वाटला आणि त्याबद्दल अजून माहिती जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. शेवटी, तो योग आलाच... समर्थन आणि मी शिकत असलेल्या संज्ञापन व पत्रकारिता विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने कलिना संकुलातील मुंबई विद्यापीठाच्या कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे मानवी हक्क वार्ता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमातील पत्रकारांना पुरस्कृत होतांना पाहण्याची संधी मला मिळाली.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ए.बी.पी. माझाचे संपादक राजीव खांडेकर, जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुंदर राजदीप, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष श्री. रामकृष्णन हे होते तसेच समर्थनचे संस्थापक विवेक पंडित, उपाध्यक्ष आशिष कुलकर्णी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले. त्यांनी केलेल्या अप्रतिम सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.

प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच समर्थन संघटना आणि मानवी हक्क वार्ता पुरस्कार, ग्रामीण संघटनांकडून व ग्रामीण पत्रकारांकडून येणारे लोकांचे प्रश्न समजुन घेण्याचे कार्य, प्रश्नावर विविध स्तरांपर्यंत चर्चा घडवून आणणे, लक्षही यंत्रणेविषयी माहिती प्रसारित करणे हे सर्व काम समर्थन कशाप्रकारे पूर्ण करते याविषयीची माहिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिली.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात परिश्रमपूर्वक वृत्तसंकलन करून मानवी हक्कांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देण्याचे हे 20 वे वर्ष आहे, असे जेव्हा अध्यक्षांकडून ऐकले तेव्हा समर्थन बद्दलचा माझ्या मनातील अभिमान वाढला. या कार्यक्रमांतर्गत प्रमुख अतिथींतर्फे "मानवी हक्क वार्ता पुरस्कार" विशेषांकाचे उद्घाटन करण्यात आले.

डॉ. सुंदर राजदीप यांनी आपले मत मांडतांना असे सांगितले की, मानवी हक्क वार्ता पुरस्कार खरोखरच पत्रकारांना प्रोत्साहित करणारा आहे. माझे बालपण अतिदुर्गम आदिवासी भागात गेल्यामुळे मला मानवी हक्कांबाबत द्यावा लागणाऱ्या लढ्याची जाणीव आहे, असे ते यावेळी म्हणाले. यासाठीच मानवी हक्काबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी समर्थनने पत्रकारिता विभागाशी संलग्नित राहून एखादी कार्यशाळा राबवावी, अशी कल्पना डॉ.राजदीप यांनी समर्थन अध्यक्षांना सुचवली.

मुद्रीत, दृकश्राव्य माध्यम यांच्या सोबतच सकारात्मक दृष्टीने सोशल मीडिया कशापद्धतीने पुढे जात आहे याबद्दल राजीव खांडेकर यांनी सांगितले. तसेच शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यातील पाण्याची गंभीर समस्या असो किंवा अंबाजोगाईतील मेडीकल हॉस्पिटलमधून लहान बाळाला मांजरीने पळवून घेऊन जाण्याची समस्या असो यासारख्या समस्यांना फक्त एक सक्षम पत्रकारच वाचा फोडू शकतो असे अनेक उदाहरणाद्वारे श्री. खांडेकर यांनी सांगितले.

निवड समिती सदस्य आशिष जाधव (महाराष्ट्र- 1 वृत्तवाहिनी सहसंचालक), नीरज राऊत (दै.सकाळ, पालघर जिल्हा प्रतिनिधी), रामकृष्णन (यूएनआय/पीटीआय) यांच्या दृष्टीने पुरस्कार प्राप्त असलेले पत्रकार खरचं पुरस्कारासाठी योग्य होते याची खात्री तेव्हा पटली जेव्हा त्यांच्या कारकिर्दीविषयी ऐकले. प्रत्येकाने ग्रामीण भागात विशेष कार्य केले होते, आपल्या वैशिट्यपूर्ण लेखणीतून प्रश्नाचे उत्तर मांडले होते.

प्रमुख अतिथींतर्फे हर्षद कशाळकर (दै.लोकसत्ता रायगड), रामदास साळुंखे (दै. जनप्रवास), ओमकार पोटे (दै. पुढारी), प्रताप मेटकरी (दै. सकाळ), राजलक्ष्मी पुजारे-जोशी (दै.महाराष्ट्र टाइम्स), भगवान खैरनार (दै.सकाळ पालघर), भास्कर सोनवणे (दै. सकाळ नाशिक) यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे नव्याने काम करण्याची उमेद निर्माण होते तसेच प्रोत्साहन मिळते, असे मत पुरस्कार विजेते हर्षल कशाळकर आणि राजलक्ष्मी पुजारे यांनी व्यक्त केले.

आपणही काहीतरी चांगले कार्य करावे, ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी समर्थन किंवा तत्सम संघटनेतर्फे पुढाकार घ्यावा, आणि पत्रकारितेच्या माध्यमाने लेखणीतून मानवी हक्कावर काहीतरी लिहावे, अशी इच्छा मला पुरस्कारप्राप्त विजेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून झाली.

-किशोरी यशवंत घायवट


होम मिनिस्टर ( Episode of serial)

        झी मराठी वाहिनी, माझी आवडती वाहिनी आहे.  यावरील कार्यक्रम खरचं बरेच काही शिकवतात.. झी मराठी, मी मराठी अशी टॅगलाईन असणारी ही वाहिनी अनेक कार्यक्रमांचा संच प्रेक्षकांसमोर सादर करत असते. त्यात जुळून येति रेशीमगाठी, जय मल्हार, नांदा सौख्य भरे, पसंत आहे मुलगी, सौभाग्यवती, होणार सून मी या घरची यांसारखे  अनेक कार्यक्रम आहे. त्यात मला होम मिनिस्टर हा कार्यक्रम आवडतो. 

      १० वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंदाचा, चैतन्याचा एक झरा वाहतोय, ज्याच्या दिवसागणिक मनोरंजनाच्या कक्षा रुंदावत जात आहेत. ‘दार उघड बये दार उघड’ असे म्हणत दररोज संध्याकाळी ६.३० वाजता आनंदाची उधळण करीत झी मराठीवर ‘होम मिनिस्टर’ घेऊन येतात महाराष्ट्राचे लाडके ‘आदेश भाऊजी’. महिलांना स्वतःचा असा आपला वाटणारा हा दूरचित्रवाणीवरील पहिलावहिला कार्यक्रम. १० वर्षात कार्यक्रमाची अनेक पर्व पार पडली. प्रत्येक पर्वात महाराष्ट्रातील घराघरातून मिळालेले प्रेम खूप मोलाचे होते. ‘होम मिनिस्टर’ने फक्त सुखाची दारं उघडून दिली नाहीत तर त्या त्या घरातील दुःखांवर मायेची फुंकरही घातली. लोकप्रिय अभिनेत्यांच्या घरापासून ते सर्वसामान्य वहिनींच्या घरात हा कार्यक्रम प्रत्येक घरात सुखाने नांदला.

कधी वहिणीसोबत तर कधी अनेक दिग्गजांसोबत खेळले जाणारे विविध खेळ, पैठणीचे रंग, घराची सजावट, ठिकाणांनुसार भाषेचा बदलत जाणारा लहेजा या सर्व सुखद गोष्टींचा अनुभव होमी मिनिस्टर या कार्यक्रमामुळे येतो. सुख, दुःख, मनोरंजन, मज्जा-मस्ती, ज्ञान या सर्वांचा मिलाप साधणारा होमी मिनिस्टर हा कार्र्यक्रम खरचं पाहण्यासारखा आहे.

झी मराठी अशीच महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात बहरत जावो व तमाम मराठी मुलुखाचा अभिमान व स्वाभिमान आपण जपत महाराष्ट्रासह देशभरातीलचं नव्हे तर जगभरात आपल्या वाहिनीचा व कार्यक्रमाचा नावलौकिक वाढीस लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना….!

 

किशोरी यशवंत घायवट

माझे कॉलेज जीवन ( College Life)



कॉलेज लाईफ  या शब्दांचा अर्थ किंवा महत्व कदाचित कॉलेज संपल्यावर जास्त समजतो कारण एखादी गोष्ट जेंव्हा आपल्याजवळ नसते तेव्हांच तिचे महत्व आपल्याला जास्त कळते आणि हे आनंदी दिवस तर आपल्या जीवनात अगदीच अलगद, नकळत येतात की जेव्हा आपण वयाच्या रुपांतरणाच्या अवस्थेत जास्त असतो. रुपांतरणाची अवस्था म्हणण्याचे कारण की, 11/12 वी ही जी महाविद्यालयीत वर्षे असतात, ती साधारणत: प्रत्येकाची कॉलेज या शव्दाचा अर्थ समजण्याच्या आधीच संपून जातात.  आपल्या कॉलेजची एक चांगली प्रथा आहे प्रत्येक बॅच स्वत:साठी एक नाव ठरवते आणि ती  बॅच त्याच नावाने ओळखली जाते. आजही FRIENDS FOREVER...  हा शव्द नुसता आठवलातरी संपूर्ण बॅच डोळयासमोर उभा राहते आणि संपूर्ण कॉलेज जीवन एका झटक्यात समोरुन निघून जाते. असे वाटते की, या नावात काही तरी जादू आहे. कॉलेजच्या काळात जेव्हा एखादा निर्णय घेण्याची वेळ यायची त्यावेळी मनात एक आत्मविश्वास  असायचा कारण तो निर्णय यशस्वी करण्यासाठी संपुर्ण बॅच आपल्या मागे आहे याची खात्री असायची. हा आत्मविश्वास  किंवा अशी खात्री असण्याला कारण ती म्हणजे बॅचमध्ये असणारी युनिटी. मतभेद, गृपस् प्रत्येक बॅच मध्ये असतातच आम्हीही काही त्याला वेगळे नव्हतोच पण जेव्हा सगळयांनी मिळून घेतलेला निर्णय आपल्याला मान्य असो किंवा नसो तोच आपला निर्णय आहे असे समजून बॅचला पाठींबा देणारी भावना आमच्यामध्ये होती. उदाहरणच द्यायचे झालेतर अक्षरश: आमच्या बॅचच्या नाव ठेवण्यावरुन ही बरेच मतभेद झाले परंतू जेव्हा नाव ठरले तेव्हा ते नाव प्रत्येकाने असे जगले की जसे काही ते नाव मीच सुचवले होते. मला वाटते की आमच्या सर्वांच्या सफल कॉलेज जीवनाचा खरा मुलमंत्र कदाचीत ही भावनाच होती. या भावनेनेच आमच्या बॅचला किंवा आमच्या कॉलेज जीवनाला एका विषेश आयामापर्यंत पोहचलेलो पाहतो.

   खरच  बीएमएम ची 'ती' ३ वर्षे कशी गेली ते कळलंच नाही, पण त्या तीन वर्षात केलेली मज्जा आयुष्यभर आठवण्यासारखी आहे. बिर्ला कॉलेज, तेथील निसर्गरम्य वातावरण, अनेक कार्यक्रम, वृक्षदिंडी, आर्ट सर्कल, बिर्लोस्तव, बिर्लाईट मॅगझीन, द्रिश्य, प्रवाह यांसारखे इव्हेंट्स नेहमी स्मरणात राहतील.... बिर्ला कॉलेज चे सर्व शिक्षकवृंद, इतर कर्मचारी खूप चांगले होते. अडचणीच्या वेळी मदतीसाठी तत्पर असणारे तेच होते, आणि काहीवेळा चूक झाली की माफ करून समजावून सांगणे ही तेच होते.... 

  पुन्हा त्या पहिल्या बाकावर बसून लेक्चर्स ऐकावे, नोट्स काढाव्यात, अभ्यासासोबत मौज-मज्जा करावी असे आता वाटते... खरचं ते दिवस पुन्हा जगावे आणि काही क्षणांसाठी का होईना पण त्यातच विसावून राहावे... 

 -किशोरी यशवंत घायवट


लक्षात राहिलेला प्रवास (Journey)


 पुणे – मुंबई प्रवास हा माझा तसा सर्वात आवडता प्रवास...  फक्त  हाय वे वर कोठे ट्रॅफिक नाही लागली की मग जरा बरं वाटतं.   काहीजण तर रोजच मुंबई- पुणे असा प्रवास करतात, त्यांना कंटाळा कसा येत नाही काय माहित?  मी एकदा माझ्या कॉलेज फ्रेंड्स सोबत पुण्याला गेले होते. कल्याण ते पुणे असा खाजगी बसने आम्ही प्रवास केला. प्रवासात गाण्यांच्या अंताक्षरी, काही जनरल  नॉलेज च्या गोष्टी शेयर होत होत्या. प्रवासात खूप मज्जा आलेली.  पुण्याला पोह्चल्यांनंतर आम्ही व्हिट्स हॉटेल मध्ये गेलो. तिथे सर्व सामान ठेवलं आणि मग नंतर फ्रेश होऊन आम्ही सर्वजण गोवर्धन फॅक्टरी ला भेट देण्यासाठी गेलो. प्रत्येक वेळी डिस्कवरी चॅनेल वर पाहिलेली प्रोसेस प्रत्यक्षात पाहतांना कुतूहल वाटत होते. तिथे आम्ही गोवर्धन च्या अनेक पदार्थांची खरेदी केली. तिथून आम्ही एका ठिकाणी गेलो जिथे सोलकढी खूप प्रसिद्ध होती. ते झाल्यांनतर आम्ही सारस बाग, पर्वती या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणांना पाहून आम्ही भारावून गेलो. ऐन पावसाळ्यात गेल्यामुळे तेथील देखावा पाहण्यासारखा होता. 

त्यांनतर आम्ही टिळक वाड्याला गेलो. टिळकांची स्मारक, पुस्तके, गणेशोत्वाची पालखी, सर्व फोटोज आम्ही न्याहाळून पाहत होतो. तिथे जाऊन आम्हाला खूप काही पाहता आले. त्यामुळे आमच्या ऐतिहासिक ज्ञानात भर पडली.. विद्येचे माहेरघर असणारे पुणे तिथे काय उणे हे म्हणणे तसे खरेच आहे. याची जाणीव पुण्याला गेल्यावर नक्की होते. 

- किशोरी यशवंत घायवट

शिक्षक होण खरच सोप्प नसत!

शिक्षक होऊ पाहणाऱ्या किंवा शिक्षक होण्यात काय अवघड आहे ? असा समज बाळगणाऱ्या तरुणांसाठी … ' छडी लागे छम छम ' चा जमाना संपला आ...