Monday, 25 September 2017

शिक्षक होण खरच सोप्प नसत!



शिक्षक होऊ पाहणाऱ्या किंवा शिक्षक होण्यात काय अवघड आहे? असा समज बाळगणाऱ्या तरुणांसाठी
'छडी लागे छम छम' चा जमाना संपला आत्ता,
मास्तरांना पाहून कापनेही पळाले आत्ता,
व्यक्ती-स्वातंत्र्यात श्वास घेणारे विद्यार्थी,
विद्यार्जनातही स्वतंत्र होणे पाहू लागले!
'' गुरुजीचा जाऊन 'गुगल' चा आला,
गुरु-शिष्याच्या नात्यातही बदल होऊ लागला,
वाटेल काहींना काय कठीण आहे शिक्षक बनण्यामध्ये?
मुलांसमोर उभे राहून शिकवण्यामध्ये?
त्याचं ऐकल नाही तर कुठे काही होत?
आमच स्वत:च च स्वत:ला सार काही येत!
पण जीवनाच्या गणितात अडतो तेव्हा कळत,
 'दोन' दिवस डोक खाजवाव तेव्हा वळत!
सरांनी दिलेलं सूत्र बरोबर लागू पडत!
आपण वेळीच निभावतो,
 कारण आयुष्याची री-एक्झाम होत नाही!
स्वत: शिक्षक होतो तेव्हा कळत
 न जुमानणाऱ्या वर्गासमोर उभ राह किती कठीण असत!
हिंमत लागते,
सर्वांना शांत करून ऐकायला लावण ही सोप्प नसत,
चार शब्द शिकवायलाही आयुष्याची ४० पान पडताळून पहावी लागतात.....
स्वत:ला असो माहिती किती ही,
विद्यार्थ्यांच्या कक्षेपर्यंत पोहोचायला कितीतरी  पायऱ्या उतराव्या लागतात!
कसे शोधावे शब्द साजेसे, सोपे करून कसे सांगावे?
स्वत: ची शैली सहज निर्माण होत नाही,लागतात परिश्रम घ्यावे,
जरा शब्द इकडचा तिकडे झाला तर प्रतिप्रश्न तयारच असतो,
चूक स्वत: ची मानायलाही खरा शिक्षकच असावा लागतो,
शिक्षक व्यक्तिमत्त्वाचा कुठलाही ठिपका उचलावा असा आदर्श
उलगडेल सार क्षणात असा प्रतिभाशाली वक्ता
 माहितीच ताक नव्हे तर ज्ञानाच लोणी देईल
विषयाच्या अंगाने व्यवहाराच ज्ञान देईल
 जाता जाता सहजच जीवनाच गमक सांगून जाईल... 
शिक्षक म्हणजे स्वत:च एक विद्यापीठ असत,
शिक्षक होण खरच सोप्प नसत, खरच सोप्प नसत!
 
-किशोरी घायवट

जेव्हा ‘ती’ मोबाईल विसरते



                        बसस्टॉप वर पोहचताच तिला हवी असलेली बस आल्यामुळे ती, त्याला ‘बाय’, ‘सी यू’ असं म्हणून बस मध्ये चढते. तो ही तिचा हसतच निरोप घेतो.  आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे खरतर पहिल्यांदाच तिला बस रिकामी मिळाली होती. रोज बसमध्ये कुठे रिकामी सीट आहे का हे बघायला लागायचं पण आज मात्र बसमध्ये कोणी प्रवासी आहेत का याचा शोध ती घेत होती. बसमध्ये कंडक्टर-ड्राईव्हर, ती आणि अजून चार प्रवासी होते. रिकाम्या बसमध्ये तिने मनाला पटेल अशी खिडकीतली जागा पकडली. रिमझिम पावसाच्या सरी थांबल्यामुळे तिने बस मधील गंज चढलेली खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिचा नेहमी निष्फळ ठरणारा प्रयत्न आज मात्र यशस्वी ठरला होता. बाहेरचं हिरवगार वातावरण, थंडगार हवा यांचा आनंद ती खिडकीतून बाहेर पाहत घेत होती. वाऱ्याच्या झुळुकेने उडणारे तिचे केस सावरत ती गाणी ऐकण्यासाठी इयर फोन शोधायला पर्स चाचपडते. कधीच वेळेवर न सापडणारा इयर फोन तिला आज मात्र सहजच सापडतो. या आधी न घडलेल्या गोष्टी अचानक घडतांना पाहून तिला आश्चर्य वाटत होतं. नेहमीच्या सवयीप्रमाणे आधी इयर फोन कानाला लावून नंतर ती मोबाईल काढण्यासाठी पर्सचा प्रत्येक कप्पा तपासते. मोबाईल कुठेच मिळत नाही. मोबाईल....??? विचार करताच तिला आठवतं की मोबाईल तर त्याच्या जवळचं राहिला..आता? काय करायचं? कुठे थांबायचं? मोबाईल तर हवाच.. घरून फोन आला तर? त्याला तर माझा नीट पत्ता पण माहित नाही....यांसारखे अनेक प्रश्न तिच्या मनात गर्दी करतात. या प्रश्नांची उत्तरे न शोधता ती फक्त एकदा हसते..तिच्याच मूर्खपणावर. मोबाईल कसा विसरू शकते?  पाऊस खूप पडत होता म्हणून त्याच्या हातात असलेला फोन त्याने बॅग मध्ये ठेवला आणि त्यानंतर त्याच्या जवळच राहिला. पण असं कसं, तुला आठवण नको तो परत घेण्याची? पण बस आली ना लगेच..नाही आठवलं मला पटकन. मोबाईलच्या विरहात ती स्वत:च्या मनाची समजूत स्वत: च काढत होती.  बस वेगात पुढे निघून जात होती. ती सारखी खिडकीतून डोकावून बाहेर पाहत होती. कदाचित तो मागून बाईकवर येत असावा असा गोड गैरसमज मानून तिची नजर त्याला शोधत होती. तो एका ठिकाणी थांबून त्याचं काम आटोपून दुसरीकडे जाणार आहे इतकचं तिला माहित होतं. पण मग नेमकं थांबावं कुठे? असा विचार ती करत होती.
                        कुठे ही बाहेर जातांना-येतांना कधीतरी चुकून एखादी गोष्ट विसरले असेन आणि ती वस्तू म्हणजे रुमाल. तो ही कोणाकडे थोडा वेळ  ठेवायला दिला असेल तरच.. कधीच कोणती वस्तू न विसरणारी.. मोबाईल कसा विसरली? मोबाईल तर कधीच कोणाकडे देत नाहीस तू..स्वत:च्या अस्तित्वाची ओळख समोरच्याला कळू नये म्हणून ठेवलेला मोबाईलचा पासवर्ड.. तो ही तू कधी कोणाला  सांगत नाहीस. आज तर मोबाईलच देऊन टाकलास.. असं कसं झालं??
                    असे अनेक प्रश्न तिचे मन तिला विचारत होते....ते ही त्याच्याजवळ..कोण तो? काही दिवसांचीच ओळख..थोडा भूतकाळ,थोडा वर्तमानकाळ आणि थोडा भविष्यकाळ माहित असलेला..नाव-गाव माहित असूनही स्वभावाची पुरेशी ओळख नसलेला..आनंदी, मस्तीखोर, हुशार, आत्मविश्वासू, चंचल असा तो..इतकीच त्याची ख्याती..तिच्या मनातली..
बससोबतच तिच्या मनातील प्रश्नांचा प्रवास सुरूच होता. ती विचार करते, मनाला उत्तर देण्यासाठी..
                      हो, नाही देत मी कोणाकडे फोन, किंवा नाही सांगत कोणाला पासवर्ड..पण याच्याकडे दिला..कदाचित इतका विश्वास तर कमावला आहेच त्याने माझ्या मनाचा..विश्वासाने मी दिला होता, तो ही सर्व काम बाजूला ठेऊन त्याच विश्वासाने मला मोबाईल परत देण्यासाठी येईल इतका ठाम विश्वास त्याच्याबद्दल माझ्या मनात कोरला आहे.
                          असा विचार करतच ती बसमधून एका स्टॉपवर उतरते. काय माहित का पण तो इथेच भेटेल असं तिला वाटतं असतं. बराच वेळ त्याची वाट पाहते. इथे कोणी नातेवाईक भेटले तर त्यांना काय सांगू? मोबाईलबद्दल खरचं सांगू का? असं स्वत:शीच बडबडत ती काही पाऊले पुढे चालते. आणि नेमकं तेव्हाच तो मागून येतो...उन्हाच्या झळाळीत घामाने भिजलेला चेहरा पुसत स्मित हास्य करून ती तिचा मोबाईल त्याच्या कडून घेते. दोघेही एकमेकांना जास्त वेळ थांबायला लागलं म्हणून आणि कामं अर्धवट सोडायला लागली म्हणून सॉरी म्हणतात..”अरे तुझा नंबर पण लक्षात नव्हता फोन करायला” असं ती त्याला म्हणते..”पण तुमचा नंबर तर तुम्हाला माहित होता ना? फोन करायचा ना त्याच्यावर”...असं तो बोलल्यानंतर तिला पुन्हा एकदा तिच्या वेडेपणावर हसायला येतं..इतकी साधी सरळ गोष्ट माझ्या लक्षात कशी आली नाही...असा विचार ती करत असतांनाच तो पुन्हा एकदा ‘सी यू’ न म्हणता तिचा हसत निरोप घेतो. आणि ती देखील मोबाईल आणून दिल्याबद्दल त्याला प्रेमाने शाबासकीची थाप मारण्याची तीव्र पण अव्यक्त इच्छा मनातच ठेवून हास्याची लकेर चेहऱ्यावर आणत त्याला बाय म्हणते.......

- किशोरी यशवंत घायवट 

Sunday, 4 June 2017

मानवी प्रवास

'आरोग्यम धन संपदा' असे म्हणणारा माणूस,
Wealth च्या नादात Health ला विसरला,
Exercise, Dieting करत असून देखील
Fast-food च्या विश्वात हरवला.

झाडे लावा, झाडे जगवा असे नुसतेच म्हणून,
जंगलतोड करून, आकाशाला चुंबणाऱ्या बिल्डींगचे स्वप्न पाहू लागला.

'विजेची बचत काळाची गरज' असा धडापाठ करून सुद्धा,
इलेक्ट्रॉनिक साधने विनाकारण ऑन ठेऊन Social Networking मध्ये Busy राहू लागला.

'नजर हटी दुर्घटना घटी' हे ब्रीदवाक्य माहित असून पण,
इतर वाहनांना Overtake करून पुढे जायला शिकला.
आणि कराटेच्या बेल्ट साठी  मेहनत करणारा सीट बेल्ट ला मात्र विसरला.

Mineral Water पिणारा 'वडा पाव' सोबत पेप्सी-कोला पिला, आणि
पाणीपुरी खातांना मात्र पुरेपूर फसला.

हरितक्रांतीसाठी ठिंबक सिंचन करणारा Shower  खाली न्हाऊ लागला,
No Smoking च्या Board खाली स्मोकिंग करू लागलाय.

सुरक्षेचे Rules  मनात ठेऊन माणूस मनमानी करू लागला आणि
सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असूनही, यंत्र निर्माण करणारा मनुष्य अकाली आपले जीवन गमावू लागला.

क्षितिजाला पोखरून प्रकाश शोधणारा माणूस निसर्गाला थोपवून त्सुनामींना Miscall करू लागला आणि म्हणूनच,
वाळवंटाचा भस्मासुर तुफानात खुदूखुदू हसू लागला, खुदूखुदू हसू लागला !

- किशोरी यशवंत घायवट

#जागतिकपर्यावरणदिन
#५जून

Sunday, 12 March 2017

खजिना पत्रिकांचा





प्रत्येकालाच कोणत्या न कोणत्या वस्तूंचा संग्रह करण्याची आवड असते. त्यामध्ये जुने कॉईन्स,कलरफुल पेन्स,बांगड्या,स्टिकर्स,रेल्वे किंवा बस ची तिकिटे तसेच डेरी मिल्क कॅडबरीची गोल्डन रॅपर्स यांचा समावेश हमखास होतो. आवडत्या वस्तूंचा संग्रह म्हणजे एक खजिना च असतो. माझा ही असाच एक खजिना आहे तो म्हणजे पत्रिकांच्या कव्हर्सचा.घरातील इतर मंडळी पत्रिका वाचण्यात आनंद मानत असतात पण माझा खरा आनंद पत्रिकेच्या कव्हर वर अवलंबून असतो. पत्रिका वाचून झाल्यानंतर लगेचच मूळ पत्रिकेपासून तिचं कव्हर वेगळे करण्याकडे माझा कल असतो. बदलत्या काळानुसार पत्रिकांमध्ये बदल होत गेले.त्यामुळे हा छंद जोपासण्याची माझी आवड अधिकाधिक वाढत गेली. आत्तापर्यंत माझ्याजवळ २०० आकर्षक,रंगीबेरंगी पत्रिकांचा संग्रह आहे. मग त्या लग्नाच्या असोत किंवा वाढदिवसाच्या. कव्हरवर टिशू लावून त्यावर डिझाईन असलेल्या, फक्त चमकीने फुलांची डिझाईन केलेल्या तसेच गौतम बुद्ध,गणपती,वधु-वर,आणि वधुची पालखी यांच्या सुंदररीत्या साकारलेल्या चित्रांची पत्रिका असे ग्रुप्स मी यामध्ये केले आहेत. काही वेळा या कव्हर्स वर कोणत्या ही सणाच्या शुभेच्छा लिहून ठेवायला ही मला आवडते. असे केल्यामुळे माझा हा खजिना मी इतरांना ही दाखवू शकते, आणि कोणाला भेटवस्तू म्हणून ही देऊ शकते. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
-किशोरी घायवट

Thursday, 1 September 2016

“एक सोहळा ऐसाही”



'पत्रकारिता'....लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक महत्त्वाचा स्तंभ. ज्यामुळे अनेक प्रश्नांना वाचा फोडणे सोपे होते, समस्यांतून मार्ग काढणे सोयीस्कर होते... पत्रकारितेचे यश पत्रकारांवर अवलंबून असते. यात पत्रकारांचा मोठा वाटा असतो. एखाद्या घटनेला लिखाणाच्या स्वरूपात रूपक भाषेत मांडण्याचे कार्य पत्रकार करत असतो. अनेकदा पत्रकाराने मांडलेल्या शैलीवर नकारात्मक भाष्य केले जाते. तर काहीवेळा त्या लिहिलेल्या सदरामुळे समाजात महत्त्वपूर्ण बदल घडून येतो आणि समस्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. शहरी तसेच ग्रामीण भागातील पत्रकार मेहनत घेऊन आपले कार्य पूर्ण करत असतात. शहरी भागात पत्रकारांचे ते कार्य दिसून येते त्यांना पुरस्कारांमार्फत प्रोत्साहन ही मिळते. परंतु, ग्रामीण भागातील पत्रकारांचं काय? ग्रामीण, दुर्गम भागात पत्रकारांमुळे काहीतरी वेगळे घडत असेल तर त्यांना कोणती शाबासकीची थाप का मिळत नाही? असा प्रश्न माझ्या मनात असतांनाच समर्थनया संस्थेबद्दल समजले आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर ही मिळाले...

समर्थन ही एक अशी संघटना जी राज्यातील धोरणात्मक प्रश्नावर विविध उपेक्षित समाजघटक व धोरणकर्ते यांच्यामधील कार्य सोयीस्करपणे पार पाडते. उपेक्षितांच्या न्याय्य हक्कांचे आणि संघर्षाचे समर्थन करणे हा यामागचा उद्देश्य आहे. मला या संघटनेविषयी कळाले त्यावेळी समर्थन बद्दल अभिमान वाटला आणि त्याबद्दल अजून माहिती जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. शेवटी, तो योग आलाच... समर्थन आणि मी शिकत असलेल्या संज्ञापन व पत्रकारिता विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने कलिना संकुलातील मुंबई विद्यापीठाच्या कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे मानवी हक्क वार्ता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमातील पत्रकारांना पुरस्कृत होतांना पाहण्याची संधी मला मिळाली.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ए.बी.पी. माझाचे संपादक राजीव खांडेकर, जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुंदर राजदीप, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष श्री. रामकृष्णन हे होते तसेच समर्थनचे संस्थापक विवेक पंडित, उपाध्यक्ष आशिष कुलकर्णी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले. त्यांनी केलेल्या अप्रतिम सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.

प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच समर्थन संघटना आणि मानवी हक्क वार्ता पुरस्कार, ग्रामीण संघटनांकडून व ग्रामीण पत्रकारांकडून येणारे लोकांचे प्रश्न समजुन घेण्याचे कार्य, प्रश्नावर विविध स्तरांपर्यंत चर्चा घडवून आणणे, लक्षही यंत्रणेविषयी माहिती प्रसारित करणे हे सर्व काम समर्थन कशाप्रकारे पूर्ण करते याविषयीची माहिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिली.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात परिश्रमपूर्वक वृत्तसंकलन करून मानवी हक्कांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देण्याचे हे 20 वे वर्ष आहे, असे जेव्हा अध्यक्षांकडून ऐकले तेव्हा समर्थन बद्दलचा माझ्या मनातील अभिमान वाढला. या कार्यक्रमांतर्गत प्रमुख अतिथींतर्फे "मानवी हक्क वार्ता पुरस्कार" विशेषांकाचे उद्घाटन करण्यात आले.

डॉ. सुंदर राजदीप यांनी आपले मत मांडतांना असे सांगितले की, मानवी हक्क वार्ता पुरस्कार खरोखरच पत्रकारांना प्रोत्साहित करणारा आहे. माझे बालपण अतिदुर्गम आदिवासी भागात गेल्यामुळे मला मानवी हक्कांबाबत द्यावा लागणाऱ्या लढ्याची जाणीव आहे, असे ते यावेळी म्हणाले. यासाठीच मानवी हक्काबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी समर्थनने पत्रकारिता विभागाशी संलग्नित राहून एखादी कार्यशाळा राबवावी, अशी कल्पना डॉ.राजदीप यांनी समर्थन अध्यक्षांना सुचवली.

मुद्रीत, दृकश्राव्य माध्यम यांच्या सोबतच सकारात्मक दृष्टीने सोशल मीडिया कशापद्धतीने पुढे जात आहे याबद्दल राजीव खांडेकर यांनी सांगितले. तसेच शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यातील पाण्याची गंभीर समस्या असो किंवा अंबाजोगाईतील मेडीकल हॉस्पिटलमधून लहान बाळाला मांजरीने पळवून घेऊन जाण्याची समस्या असो यासारख्या समस्यांना फक्त एक सक्षम पत्रकारच वाचा फोडू शकतो असे अनेक उदाहरणाद्वारे श्री. खांडेकर यांनी सांगितले.

निवड समिती सदस्य आशिष जाधव (महाराष्ट्र- 1 वृत्तवाहिनी सहसंचालक), नीरज राऊत (दै.सकाळ, पालघर जिल्हा प्रतिनिधी), रामकृष्णन (यूएनआय/पीटीआय) यांच्या दृष्टीने पुरस्कार प्राप्त असलेले पत्रकार खरचं पुरस्कारासाठी योग्य होते याची खात्री तेव्हा पटली जेव्हा त्यांच्या कारकिर्दीविषयी ऐकले. प्रत्येकाने ग्रामीण भागात विशेष कार्य केले होते, आपल्या वैशिट्यपूर्ण लेखणीतून प्रश्नाचे उत्तर मांडले होते.

प्रमुख अतिथींतर्फे हर्षद कशाळकर (दै.लोकसत्ता रायगड), रामदास साळुंखे (दै. जनप्रवास), ओमकार पोटे (दै. पुढारी), प्रताप मेटकरी (दै. सकाळ), राजलक्ष्मी पुजारे-जोशी (दै.महाराष्ट्र टाइम्स), भगवान खैरनार (दै.सकाळ पालघर), भास्कर सोनवणे (दै. सकाळ नाशिक) यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे नव्याने काम करण्याची उमेद निर्माण होते तसेच प्रोत्साहन मिळते, असे मत पुरस्कार विजेते हर्षल कशाळकर आणि राजलक्ष्मी पुजारे यांनी व्यक्त केले.

आपणही काहीतरी चांगले कार्य करावे, ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी समर्थन किंवा तत्सम संघटनेतर्फे पुढाकार घ्यावा, आणि पत्रकारितेच्या माध्यमाने लेखणीतून मानवी हक्कावर काहीतरी लिहावे, अशी इच्छा मला पुरस्कारप्राप्त विजेत्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून झाली.

-किशोरी यशवंत घायवट


शिक्षक होण खरच सोप्प नसत!

शिक्षक होऊ पाहणाऱ्या किंवा शिक्षक होण्यात काय अवघड आहे ? असा समज बाळगणाऱ्या तरुणांसाठी … ' छडी लागे छम छम ' चा जमाना संपला आ...