Thursday, 30 June 2016

मंत्रालय - एक अविस्मरणीय अनुभव

पत्रकारिता विषयाला असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशीप करावी लागते. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या वृत्तपत्रात, न्यूज चॅनेल्सला पाठविण्यात येते. माझ्या बॅचच्या विद्यार्थ्यांची आंतरवासिता म्हणून थेट मंत्रालयातील माहिती विभागात नियुक्ती करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो. तेथे काम करण्याचा अनुभव काही औरच असतो.

मुंबई विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता या विभागात शिकत असताना मंत्रालयाला भेट देण्याचा योग आला. या दोन दिवसीय भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. शिक्षणमंत्री विनोद तावडे, विरोधी पक्ष नेते मा. धनंजय मुंडे यांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची, तसेच त्यांच्याकडून पत्रकारिता या क्षेत्राबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश करण्यासाठी उभे असलेल्यांची गर्दी आणि त्यात मी मध्येच येऊन एका ओळखपत्राच्या आधारे थेट मिळविलेला प्रवेश हा अनुभव अविस्मरणीय आहे. मंत्रालयात वावरत असताना प्रत्येक ठिकाणी जबाबदारीची जाणीव येते. मंत्रालयातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस करत असलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे.

मुख्य इमारतीच्या तळ मजल्यावर असलेले माहिती व जनसंपर्क महासंचानालयात मी जेव्हा प्रवेश केला. तेव्हा संचालक (माहिती/प्रशासन) मा.देवेंद्र भुजबळ यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र शासनाचे 'महान्युज' या वेब पोर्टल साठी काम करण्याचे सांगितले. महान्युज वेब पोर्टलचे सहायक संचालक बी.के.झंवर सरांनी इंटर्नशीपच्या पहिल्याच दिवशी त्यांच्याकडे असलेले अनुभव माझ्याशी शेअर केले. महान्युज मधील इतर सहकाऱ्यांची ओळख करून दिली.

महान्युजला 'महाभ्रमंती' सदरासाठी मी 'माहुली गड' यावर लेख लिहिला. तो लेख माझ्या नावासहित प्रसिद्धही करण्यात आला. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. वसुधा कामत यांची मी मुलाखत घेतली. हा अनुभव नेहमी माझ्या लक्षात राहील. येथील वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जण मोठ्या पदावर असून देखील त्यांच्या कामातून वेळ काढून आम्हाला हवी ती माहिती देतात, मदत करतात. सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीसाठी असच शिकत राहावं, अनेक काम करावी, त्यांना मदत करावी अशी इच्छा मनात येताच ओळख पत्रावरील 'तात्पुरते' हा शब्द आठवतो, आणि आपण येथे काही दिवसांकरिताच आहोत याची जाणीव होते. त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर काम करण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची उमेद निर्माण होते.

-किशोरी यशवंत घायवट

अप्रतिम माहुली किल्ला

माहुली किल्ला हा ऐतिहासिक किल्ला असून गिरीदुर्ग प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर-आसनगावजवळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. माहुलीच्या किल्ल्यामध्ये असलेल्या विशिष्ट अंतरामुळे किल्ल्याचे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड. ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण म्हणून माहुली किल्ला प्रसिद्ध आहे. ट्रेकर्स साठी हा किल्ला म्हणजे एक प्रकारची पर्वणीच आहे.

माहुली किल्ल्याचा इतिहास : १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजाम शाहीच्या संस्थापक असलेल्या मलिक अहमद याच्याकडे आले. पुढे शहाजीराजे निजामशाहीचे संचालक बनल्यावर दिल्लीच्या मोगल फौजा व आदिलशाही सेना संयुक्तपणे निजामशाही बुडवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. १६३५-३६ च्या सुमारास शहाजींनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर-शिवनेरीहून जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमान म्हणजे महाबतखानाच्या मुलाने माहुलीला वेढा दिला. शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली. पण त्यांनी नकार दिला असता शहाजींनी शरणागती पत्करली. पुढे १६५८ मध्ये जानेवारी रोजी शिवरायांनी हा किल्ला मोगलांकडून परत मिळवला. पण १६६१ मध्ये तो मोगलांना परत द्यावा लागला. लगेचच तो परत जिंकून घेतला गेला. १६६५ च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले. त्यानंतर मोगलांचा मनोहरदास गौड हा धोरणी कर्तबगार सरदार माहुलीवर कारभार पाहू लागला. त्याने गडावर बरेच बांधकाम करून घेतले. फेब्रुवारी १६७० मध्ये खुद्द शिवाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली माहुलीवर केलेला हल्ला अयशस्वी ठरला. दीड हजार मराठी मावळ्यांपैकी तब्बल हजार मावळ्यांचा मोगलांनी वध केला. मराठ्यांचा दणदणीत पराभव झाला. या यशानंतरही मनोहरदास गौडने किल्लेदारी सोडली. त्याच्या जागी अलाविर्दी बेग हा किल्लेदार रुजू झाला. नंतर १६ जून १६७० रोजी दोन महिन्यांच्या वेढ्या नंतर दोनशे मोगल सैनिकांचे रक्त सांडले. मोरोपंत पिंगळ्यांनी माहुली, पळसगड व भंडारगड हे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : आसनगावमार्गे माहुली गावातून शिडीच्या वाटेने किल्ल्यावर आल्यावर समोरच पाण्याच्या दोन टाक्या आहेत. पाच मिनिटांवर आणखी एक पाण्याची टाकी आहे. उजवीकडे गेल्यावर खाली पहारेकऱ्यांच्या देवळ्या आहेत. समोरच ढासळलेल्या अवस्थेतला महादरवाजा आहे. इथून भातसा राशी, अलंग, मदन, कुलंग व कळसूबाई पर्वतरांग दिसते. तर पूर्वेला हरिश्चंद्रगड, आजोबा, दक्षिणे पूर्वेला माथेरान रांग, दक्षिण पश्चिमेला तानसा खोरे तुंगारेश्वर रांग असलेला प्रचंड मुलुख दिसतो. शिडीच्या वाटेने दोन मिनिटे पुढे गेल्यावर डावीकडे जंगलात एक वाट जाते. वाटेतच छप्परवजा असणारे महादेवाचे मंदिर आहे. पुढे वाड्याचे काही अवशेष आढळतात. समोरच पाण्याचा फार मोठा तलाव आहे. पुढे गेल्यावर जांभळाचे रान लागते ही वाट खिंडीत जाऊन पोहोचते. ही खिंड म्हणजे माहुली आणि भंडारगड दरम्यानची खिंड आहे. खिंडीच्या थोडे वर गेल्यावर उजव्या बाजूस ५०० ते ६०० फुट खाली उतरल्यावर कड्यालगतच कल्याण दरवाजा आहे. खिंडीतून वाटेने वर चढत गेल्यावर झाडीमध्ये बारमाही पाण्याची भुयारी टाकी आहे. येथून पुढे जाणारी वाट गडाच्या दक्षिण टोकापाशी म्हणजेच भंडारगडावर घेऊन जाते. भंडारगडावरून समोरच उभे असणारे भटोबा, नवरा व नवरीचे सुळके दिसतात. समोरच उजवीकडे असणाऱ्या डोंगररांगेवर वजीरचा सुळका दिसतो.

कसे जाल ?

आसनगाव मार्गे : मुंबई-नाशिक लोहमार्गावरील आसनगाव स्टेशन गाठावे. इथून ५ कि.मी. अंतरावरील गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या माहुली या गावी रिक्षाने जाता येते. गडाच्या पायथ्याशी महादेवाचे सुंदर मंदिर आहे. इथून उजवीकडे एक ओढा पार करून ३ कि.मी. चा चढाव चढून जावे. वाटेत एक लोखंडी शिडी आहे. ती पार करून वर गेल्यावर समोरच पाण्याच्या दोन टाक्या दिसतात. या वाटेने गडावर जाण्यास २ तास लागतात.

वाशिंदमार्गे : लोकलने किंवा एस.टी. ने वाशिंदला उतरावे. उत्तरेला दहागाव आणि पुढे चाप्याचा पाडा गाठावा. चंदेरीचा डोंगर उजवीकडे ठेवून माहुलीच्या दक्षिण टोकापासून निघालेल्या व पश्चिमेला पसरलेल्या सोंडेवर चढावे. कल्याण दरवाजावर एक शिलालेख आढळतो.

राहण्याची सोय :

भंडारगडावर राहण्याची कोणतीही सोय नाही. किल्ले माहुलीवर मुक्काम करण्यासाठी पहारेकऱ्यांच्या देवळ्या आहेत, परंतु तसे असले तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीने माहुली किल्ल्याची सफर एक दिवसाची असलेली बरी आहे. किल्ले माहुलीवर पहारेकऱ्यांच्या देवळ्यासमोर पाण्याची टाकी आहे. येथील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. भंडारगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे तेथे जाताना पाण्याचा साठा जवळ ठेवावा लागतो. किल्ल्यावर जाण्यासाठी आसनगाव मार्गे दोन तास तसेच कल्याण दरवाजा मार्गे ६ ते ८ तास लागतात. त्यामुळे आसनगाव मार्गे केलेला प्रवास अधिक सोयीचा ठरतो.

ट्रेकर्स प्रेमींनी त्यांना आवश्यक असणारे साहित्य माहुली गडावर जातांना सोबत बाळगावे, त्यामुळे त्यांना गडावर जातांना कोणतीही अडचण येणार नाही. माहुली गडावर जातांना स्पोर्टी शूज चा वापर करावा. पिण्याचे पाणी तसेच खाण्याचे पदार्थ सोबत ठेवावेत.

थंडगार वारा, सुंदर देखावा, तलाव, बहरलेली हिरवळ या सर्व रमणीय निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर माहुली गडाला एकदा नक्की भेट दिली पाहिजे !

-किशोरी घायवट

शिक्षक होण खरच सोप्प नसत!

शिक्षक होऊ पाहणाऱ्या किंवा शिक्षक होण्यात काय अवघड आहे ? असा समज बाळगणाऱ्या तरुणांसाठी … ' छडी लागे छम छम ' चा जमाना संपला आ...